Sunday, 6 August 2017

परिशिष्ट १ : खासा मराठा म्हणविणारा

शेतकऱ्याचा असूड : महात्मा जोतिराव फुले
आसुडाचा दुसरा भाग संपून दुसरें काम हातांत घेतों आहें, इतक्यात एक ब्राम्हण चक्रीदार पागोटें घातलेला गृहस्थ माझ्यापुढे लोडाशी टेकून बसल्यानंतर, तेथील प्रत्येक सामानसुमानाकडे न्याहाळून पहात आहे. तों इकडे माझे मनांत आलें की, हे गृहस्थ मारवाड्यांतील म्हणावें, तर त्यांच्या पागोट्याखाली तीन शेंड्या लोंबत नव्हत्या. शिप्यांतील म्हणावे, तर पागोट्यावर जागोजाग सुया टोचलेल्या नव्हत्या. सोनारांतील म्हणावें, तर त्यांचे बाहूपुढे उराड निघालें नव्हतें व ब्राह्मणांतील म्हणावें, तर त्यांना दोनचार शब्द बोलतांना ऐकलें नव्हतें यावरून ते कोणत्या वर्गापैकी असावेत, म्हणून मी अनुमान करीत आहे, तोंच त्यांनी आपला मोहरा मजकडे फिरवून, आपणहूनच मला प्रश्न केला की,- “तुम्ही मला ओळखलें नाहीं काय?” मी म्हणालों, “नाहीं महाराज, मी तुम्हाला ओळखलें नाही. माफ करा.” गृहस्थ म्हणाला, “मी मराठी कुळांतील मराठी आहे." मी-“तुम्ही मराठे असाल परंतु तुमची जात कोणती?" गृ-“माझी जात मराठे." मी- “महाराष्ट्रांत जेवढे म्हणून महारापासून तों ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वासच मराठे म्हणतात.

महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
तरी तुम्ही अमुक जातीचे आहांत याचा उलगडा तेवढ्यानें होत नाही.” गृ–“तर मी कुणबी आहे असें समजा.” मी-“बरें, तुम्ही काय उद्योग करीत असतां?” गृ-“साताऱ्यातील अप्पासाहेब महाराजांस निंबाजवळच्या भागुबाई तारकशणीचा नाद लागण्याचे पूर्वी आमच्या घराण्यानें त्यांजपासून एकदोन लक्ष रुपये सहजांत कमावून आणले होते; ते आम्ही हा काळपावेतों हरी हरी करून स्वस्थ खात बसलों आहों. तुमच दयाराम आत्माराम एकीकडे आणि आम्ही एकीकडे.” मी-“बरें तर, आपण आपली पायधूळ इकडे कां झाडिली?” गृ–“मला कांहीं तुम्हांजवळ मागणे नाही, परंतु मी असें ऐकतों की, आपली समज अशी झाली आहे की, सरकारी खात्यांत ब्राह्मण कामगार असल्यामुळे ते शेतकऱ्यांस फार नाडितात व शेतकरी कामगार झाल्यास ते अशा लबाइया करणार नाहीत.” मी-“होय. माझ्या मतें एकंदर सर्व सरकारी खात्यांत शेतकऱ्यांपैकी त्यांच्या संख्येच्या प्रमाणानें कामगार झाल्यास ते आपल्या जातबांधवांस इतर कामगारांसारखें नाडणार नाहीत." गृ-“तें कसे? -याविषयी माझी तर एकदां खात्री करा." मी-“तुम्ही अशी कल्पना करा की, उद्यां जर कलेक्टरसाहेबांनी फौजदारीचे कामावर तुमची नेमणूक केली व तुमचे भाऊबंद व शेजारीपाजारी जातवाल्या शेतकऱ्यांचे आपआपसांत माराकट्टे होऊन ते तंटे तुमच पुढे आल्यास तुम्ही त्यांचा इनसाफ करतांना त्यांस अरतुर म्हणाल कां?" गृ.–”नाही.” मी-”कां बरें?" गृ-ते माझे भाऊबंद किंवा जातवाले असणार व मी ज्यांच्यांत लहानाचा मोठा झालों, त्यांना अरतुर म्हणण्याविषयीं माझी जीभ तरी कशी लवेल?”

महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
मी-”तुमच्याने आपल्या जातवाल्यांपैकी एकापासून लांच खाऊन त्याबद्दल दुसन्यास गुन्हेगार ठरवून त्यास दंड अथवा ठेपा मारवतील काय?" गृ– “नाही, तसें कधीही मजपासून होणार नाही.” मी-”कां बरे?” गृ-कारण फौजदारीची आहे जागा आज आणि उद्यां नाहीं, त्याचा काय भरोसा? एखाद्या चोंबड्या चाकरानें कलेक्टरचे कान फुकले की फौजदारीची जागा नाहींशी होणार. परंतु माझा ज्यांच्यांशीं रोटीव्यवहार, माझा ज्यांच्यांशीं बेटीव्यवहार, त्यांच्यांशीं वांकडा होऊन माझ्या मुलीमुलांस मुरळ्या वाघ करूं की काय? त्यांच्या मुलांबाळांमध्यें माझ्या मुलाबाळांना सारे जन्म काढावयाचे आहेत. त्यांची आढी माझ्या आढ्यांशीं लागली आहेत. त्यांच्या माझ्या पोरासोरांची खेळण्याची जागा एक. त्यांचा माझा पाणवठा एक. त्यांचा माझा बांधपेंडवला एक. त्यांची माझीं गुरें चारण्याचे गायरान एक. आम्ही आपल्या पडत्या काळी एकमेकांचे विळे, गोल्हया, फासा, काळ, टोल्याटोरखंडाचा व औतकाठ्यांचा उपयोग करितों. आम्हीं आपल्या सोईकरितां एकमेकांचे हेले, बैल, वारंगुळ्यानें देतों, घेतों. रात्रींबेरात्रीं आमच्या एकमेकांच्या कुटुंबांतील स्त्रिया एकमेकीस तेलमीठ, दाणादुणा उसनापासना देतात व घेतात. आम्ही एकमेकांच्या स्त्रियांचे प्रसूतकाळी त्यांच्या तान्हा बच्यासाठी न्हाण्या खांदून बाळंतिणीकरितां लगोलग बाजा आणून देतों. आमच्या त्यांच्या रीतिभाती व चालचलणुकी एक. आमचे त्यांचे खाणेपिणे व पोषक एक. आमचे त्यांचे देवदेवक एक. आमचे त्यांचे कुळस्वामी एक. आम्ही एकमेकांचे घरास लागलेल्या आगी विझवतों. आमची त्यांची मृते-क्रिया एक असल्यामुळे, आम्ही एकमेकांचे मूठमातीस मदत करूं, एकमेकांच्या मुलाबाळांचे शांतवन करण्याकरितां आपआपल्या घरच्या भाकरी व कोरड्यास घेऊन, त्यांचे घरी जाऊन त्यांस आपले ताटांत बरोबर घेऊन कडु घांस खातों आणि अशा माझ्या जातबांधवांपासून लांच खाल्यामुळे यांच्या माझ्या कुळांत हाडवैर करून घेऊं काय?

महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
मी-”यावरून तुम्हीच नीट विचार करून पहा की, ब्राह्मण कामगार अज्ञानी शेतकऱ्यांचे जातीचे नसल्यामुळे ते नानाप्रकारच्या लबाड्या करून निराश्रित अक्षरशून्य शेतकऱ्यांस आपल्या जातीपेक्षां जास्त नाडीत असतील, असें तुमची मजदेवता तुम्हांस सांगत नाही काय?” गृ.–“आतां याविषयीं माझ्यानें कांहीं बोलवत नाही, परंतु हल्ली शेतकऱ्यांपैकी कांहीं विद्वान निपजले आहेत. ते तर शेतकऱ्यांवरील संकटें निवारण्याविषयीं एखादे ठिकाणीं जमून नुस्ती प्रसिद्धपणे चर्चासुद्धां करीत नाहीत. अहो, हे भेकड घरोघर + + बाईचे नादांत असतां हे ब्राह्मण कामगारांच्या नांवानें कडाकडा बोटें मोडतात. परंतु बाहयात्कारी ब्राह्मण कामगारांचे चोंबडे चाकर बनून चोहोंकडे लुबरपणा करीत फिरतात.” मी-“अहो, जेथें विद्याखात्याकडील कामगार एज्युकेशन कमिशनापुढे एकजुटीनें साक्षी देतांना शेतकऱ्यांचे शिक्षणाविषयी फारशी वाटाघाटी न करितां कमिशनच्या डोळ्यांत धूळ टाकून, आमचे दयाळू गव्हरनर जनरलसाहेबांस फसवू पहातात, तेथे या नेभळ्या शूद्र विद्वानांचा काय पाड? त्यांनी ब्राह्मण कामगारांच्या चुक्या काढणे तर एकीकडेसच परंतु साधारण एजन्टीकडील क्षुल्लक ब्राह्मण कारकुनास एखाद्यानें लवून मुजरा केला नाहीं की, वार्षिक दरबारांत त्याला भलत्या एखाद्या कोपन्यांत धक्काधक्कीची जागा मिळून, अखेरीस त्याच्या गळ्यांत बाशा सुकलेल्या हरदासी फुलांच्या माळा पडून, गुलाबदाणींतील जलासहित त्यांच्या मनगटावर कुजक्या तेलाचे माखण मिळून, चुन्याविणा एकदोन पानपट्या हातावर पडतात. कां, मी बोललों तें खरें आहे किंवा कसें ! आतां कां उत्तर देत नाहीं? असो, तुमची मर्जी.
महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक/टच करा.
https://goo.gl/4ymbya
यापुढे तरी बारीक चौकशी करून पुन्हां एथें मजबरोबर एकंदर सर्व ब्राह्मण कामगारांविषयीं वादविवाद करण्याकरितां या बरें.”

गृ-आतां मात्र माझी पक्की खात्री झाली की, एकंदर सर्व सरकारी खात्यांत भटब्राम्हण कामगारांचा भरणा झाल्यामुळे अज्ञानी शेतकऱ्यांचे व त्याबरोबर या शहाण्या सरकारचे पण अतोनात नुकसान होत आहे. हें या सरकारी खात्याकडील ‘डायरेक्टर’ साहेबांस कसें कळत नही?” मी-“अहो बाबा, ‘डायरेक्टर’ साहेबांनी जर इतकी बारीक चौकशी करीत फिरावें, तर त्यांचा ऎषआराम कोनी भोगावा?” गृ.–”काय हो, अशा सुधारल्या इंग्रजी राज्यांत इतका अंधेर तर पेशवाईत अक्षरशून्य शेतकऱ्यांवर काय काय जुलूम झाले असतील, त्याची कल्पनासुद्धा करवत नाही. आता येतो, लोभ असो द्यावा.” इतके बोलणे आटोपल्यावर सदरहू गृहस्थ निघून गेला.


तारीख २ नोहेंबर
सन १८८२ ई. पुणे.
जो. गो. फु.
स. शो. स. स.
पुढील पान..


महात्मा फुलेंचे संपूर्ण साहित्य अॅप स्वरुपात येथे उपलब्ध आहे..

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.